एक व्यक्ती रोज खुप दूरवरून पाणी घेऊन येत असे. गौतम बुद्धांच्या पाहण्यात ही गोष्ट आली तेव्हा बुद्धांनी त्या व्यक्तीला सुचवले की तुम्ही ईतक्या दुरवरून पाणी आणता त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घराजवळ विहीर का खोदत नाही? तुमची पाण्याच्या समस्येपासून कायमची सुटका होईल. 

हा सल्ला ऐकून त्या व्यक्तीने विहीर खोदण्यास सुरुवात केली, पण सात-आठ फूट खोदल्यानंतर त्याला पाण्याचे काय अगदी ओल्या मातीचेही चिन्ह सापडत नव्हते. त्याने ती जागा सोडली आणि दुसऱ्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली, पण दहा फूट खोदूनही त्यात पाणी बाहेर आले नाही. त्याने पुन्हा तिसऱ्या स्थानावर विहीर खोदण्यास सुरुवात केली, पण इथेही तो निराश झाला. या क्रमाने त्याने आठ ते दहा फुटांच्या दहा विहिरी खोदल्या, पण पाणी कुठेच सापडले नाही.



निराश होऊन तो बुद्धांकडे गेला, त्याने बुध्दांना सांगितले की मी दहा विहिरी खोदल्या आहेत, पण एकामध्येही पाणी लागले नाही. बुद्ध आश्चर्यचकित झाले.  

ते स्वतः त्या ठिकाणी आले जिथे त्याने दहा खड्डे खोदले होते. बुद्धांनी त्या खड्ड्यांची खोली पाहिली आणि संपूर्ण प्रकार समजून घेतला.

मग बुध्द म्हणाले, 
“दहा विहिरी खोदण्याऐवजी, जर तुम्ही तुमची सगळी मेहनत एका विहीर खोदण्यात घेतली असती तर तुम्हाला पाणी कधीच मिळाले असते. ”

त्या व्यक्तीने बुद्धांची आज्ञा पाळून तसेच केले, तो विहीर खोदत राहिला परिणामी विहीर खोदत असताना त्या व्यक्तीला पाणी लागले आणि त्याची पाण्याची समस्या कायमची दूर झाली.